Saturday, 11 March 2017

बोलण्याची पद्धत

मोहन कोठेकर

      बोलणे ही एक कला आहे.  बाळाला बोलणे शिकवावे लागते.  आई त्याला बोलायचे कसे, हे शिकविते.  जसे जसे वय वाढते तसे मुल बोलावयास लागते.  मुल वाक्य बोलायला लागला की सर्वांना आनंद होतो.  प्रारंभी बाळ बोबडे बोल बोलतो.  प्रत्येक बाळाच्या बोलण्याची पद्धत वेगळी असते.  बोलण्याची पद्धत कालांतराने बदलते.  परंतु, एकदा व्यक्ती प्रौढ झाली की सर्वसाधारणपणे बोलण्याची पद्धत बदलत नाही.  बोलण्याच्या पद्धती वरून आपण त्याला ओळखू शकतो. 

      मराठी साहित्याचे जाणकार तसेच भाषेचे शिक्षक यांचा भाषेचा अभ्यास असतो.  बोलण्याचे प्रकार किती या बद्धलची सविस्तर माहिती जाणकार सांगू शकतात.  ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ या नियमांनुसार प्रत्येकाचा बोलण्याचा प्रकार वेगळा असतो.  लाखातून एखादा असा असतो की त्याचे बोलणे ऐकले की हसावे की रडावे कळत नाही.  एकदा सहस्त्र चंद्र दर्शन सोहळ्याच्या समारंभाला गेलो होतो.  आसामी लोकप्रिय असल्यामुळे कार्यक्रमाला श्रोत्यांची भली मोठी गर्दी होती.  उत्सवमूर्तीच्या परिचयाची जवाबदारी सोपविवेल्या व्यक्तीने तासभर भाषण केले.  परिचयकर्ता वक्ता मराठी भाषेचा शिक्षक होता हे नंतर कळले.  भाषणात शिक्षक उत्सवमुर्तीची स्तुती करतो आहे की टिंगल-टवाळी करतो, या बद्धल श्रोते शाशंक झाले.  नमुना म्हणून भाषणातील वाक्ये अशी होती.  “आपण सर्व येथे कशाला जमलो आहोत. यांचे वय ८० वर्षाचे झाले म्हणून? नाही. अजिबात नाही!  यांचा अनुभव आपल्या पेक्षा जास्त आहे म्हणून? नाही. अजिबात नाही!  हे आपल्या पेक्षा हुशार आहेत म्हणून? नाही. अजिबात नाही!  हे लोकप्रिय आहेत म्हणून? नाही. अजिबात नाही!”  “नाही. अजिबात नाही” आणि नकारात्मक वाक्यांचा उच्चार आपल्या भाषणात गेल्याबाजार शंभरदा केला असावा.  कालांतराने कळले की शिक्षकाची बोलण्याची हीच पद्धत आहे.  संयोजकाने पुढील कांही आठवडे आपले श्रीमुख कोणाला दाखविले नाही.

      काहींना दरडावून प्रश्नार्थक पद्धतीने बोलण्याची सवय असते.  बोलताना समोरच्याचा हात पकडतात किंवा खिचतात किंवा झटकतात.  मित्राला, चहा प्यायला चलतोस काय? हे विचारायचे आहे, तर तो कसा बोलतो एक नमुना बघा.  “काय, समजले काय?(हाताला फटका).  पुन्हा सांगणार नाही, काय?(झटका).  चहा ढोसायला टपरीवर चालतो काय?(हिसका).  पुन्हा कोकलला तर याद राख?(फटका)”.  माणूस चांगला उंचपुरा आणि धष्टपुष्ट (पत्नी सोज्वळ आणि प्रेमळ असल्याचे लक्षण) असला तर अशा वागण्याने मित्रांना प्रत्येक वेळेस शारीरिक आणि मानसिक त्रास होतो.

      माजी पंतप्रधान आणि सर्वांचे लाडके श्रद्धेय अटल बिहारी वाचपेयी यांनी पाकिस्तानला उध्येशून कारगिल युद्धापूर्वी आपल्या भाषणात एक वाक्य बोलून गेले आणि ते वाक्य पुढे अमर झाले.  वाक्य होते “दोस्त बदल सकते है पर पडोसी नही|”  महाभारतातील युधीष्टीराच्या तोंडचे “नरो वा कुंजरो वा” वाक्याच्या तुलनेचे अटलजी यांचे हे वाक्य आहे.  शब्दप्रभू, बाल ब्रम्हचारी आणि संघाचे निस्सीम शिष्य अटलजी हे आपल्या आयुष्यात युधीष्टीरासारखे एकदाच खोटे बोललेत.  अटलजी यांना खरे तर असे म्हणायचे होते की “दोस्त और पडोसी कभीभी बदल सकते है पर पत्नी नाही.”  ते अत्यंत हुशार आहेत.  त्यांना कधी, कुठे, केंव्हा आणि काय बोलावे हे बालवयापासून नुसतेच कळले नाही तर वळले आहे.  सामान्य जनता नर्मदेचे गोटेच राहिलेत, त्यांना कळले आणि वळले असते तर किती बरे झाले असते?  जर हे अमर वाक्य आपल्या तारुण्याच्या कालखंडात अटलजीनी फक्त एकदाच उच्चारले असते तर आज जनसंख्येवर नियंत्रण आले असते आणि रामराज्य ही संकल्पना पूर्णत्वाने साकार झाली असती.

      अनुभवावरून सांगतो की मुली ह्या मुलांच्या तुलनेत जास्तच बोलतात.  वयानुसार बोलण्याचे प्रमाण वाढते. लग्नानंतर हे प्रमाण विकोपाला जाते.  त्यात वाचाळ बायको मिळाली तर हरी हरी.  अखंड वाहणारा नायगारा धबधबा, थांबता थांबत नाही, थांब सांगितले तरीही थांबत नाही.  “आधीच मर्कट त्यात मद्य प्यालेले ” (वाचाळातील अर्क) बायकोची स्थिती असेल तर नवरा कायमचा अबोल होतो, त्याची बोबडी वळते, बोलण्याला मोका मिळत नाही, जीवनभर श्रोता बनतो.  कहर म्हणजे, बोलण्याची पद्धत सर्वसामान्य स्त्री सारखी नसेल तर पळून जावे की आत्महत्या करावी ह्याच संभ्रमात नवरा जीवन जगतो.  बायकोच्या आरसपानी सौंदर्याचा त्याला विसर पडतो.  आपल्या समोर एक नमुना पेश करतो.

      ती: “गेले. जायचे आहे.”  “गेले” हे शब्द नुसते ऐकले तरी घाम येतो, शरीरात कापर भरते, कोणाचा मृत्यू झाला असेल बरे! नवरा विचार करतो (लग्नानंतर पहिल्याच वर्षी, नंतर सवय होते), बायाकोकडील असेल तर सुस्कारा सोडतो, नवऱ्याकडील असेल तर वाईट वाटते.  तो: “कोण गेला. कधी जायचे.”  ती: “नारायणराव. आज.” तो: “अग सामान्य माणसाला सहजतेने समजेल अशा भाषेत बोल ना, मला तूझी भाषा कळत नाही, प्रत्येक वेळेस तू वाक्य उलट बोलतेस, तुला बोलायचं कसं हे शिकवलं नाही काय?” लगेचच निरर्थक धबधबा पुढील अर्धा तास अखंड सुरु असतो. त्यातील सामान्य वाचकांसाठी कांही वाक्ये.  ती: “ह्या घरात गेली कित्येक वर्षे बिनपगारी मोलकरीण आल्यापासून माझी हाडे झीझलीत त्या बरोबर जीभ सुद्धा झीझली. बर का.” किंवा “आजपर्यंत माझे तोंड दाबत राहिला ना, आता बोलणे विसरले, आता भोगा तुम्ही, बघते कोणाशी बोलता.” किंवा “मनाप्रमाणे या गंगाभटीणचे काहीही ऐकले नाही, आता ती कशी बोलेल, कांही दिवसातच ती मुकी होणार आहे, मग बरे वाटेल” किंवा “मेली मौज नाही, मजा नाही, खरेदी नाही, लाकडा ऐवजी जमा केलेले किसान विकास पत्र वापरा, लवकर चिता जळेल, मग आनंदच आनंद.” किंवा “मीच आहे म्हणून सगळे सहन करते, दुसरी असती तर आत्तापर्यंत पळून गेली असती, आजपासून बोलणे बंद.”  इत्यादी, नवऱ्याच्या मते वायफळ बायकोच्या मते महत्वाची बडबड.  संपूर्ण कुळाचा उद्धार केल्यानंतर आणि पूर्ण मरगळ ओकल्यानंतर तिचे मन शांत होते, मग गाडी रुळावर आल्यानंतर मूड असेल तरच संपूर्ण वृक्तांत कळतो. तो थोडक्यात असा.

“गेले” म्हणजे, शेजारचे नारायणराव कुटुंबासह संध्याकाळी चंद्रपूरला व्याह्या कडे गेले.  कांही दिवस आराम केल्यानंतर व्याघ्रदर्शनासाठी ताडोबाला जाणार. तेथून अमरावतीला लहान भावाकडे आराम करून दोन आठवड्याने घरी परतणार आहेत.  तेंव्हा नारायणरावाच्या घराची चौकीदारी आपल्याला करायची आहे.  “जायचे आहे” याचा अर्थ, आज आपल्याला संध्याकाळी कोथरूडला जोशी यांचे घरी जायचे आहे.  तेथून पुढे लक्ष्मि रोड आणि तुळशीबागेत फक्त फिरायला नाही तर नातलगाच्या लग्नाच्या कपड्यांच्या खरेदी साठी जायचे आहे.  सुजाण, जाणकार, अनुभवी आणि हुशार वाचकाला (नवऱ्याला) “जायचे आहे” चा वृक्तांत अजूनही अपुरा वाटतो.  यातील “संध्याकाळी” आणि “खरेदी” हे शब्द तिच्या साठी असतात हे अनुभवावरून कळते.  कारण, कोणतीही महिला स्वतःसाठी खरेदी केल्याशिवाय आणि श्रेयस किंवा पंचवटी मध्ये उदरभरण केल्या शिवाय कधीही घरी परतत नाही.  थोडक्यात, फक्त तीन शब्दांच्या घोळामुळे नवऱ्याला किमान पाच-सात हजार रुपयांचा फटका बसतो, वरतून बायकोची सतत बडबड ऐकावी लागते ती वेगळी.

पुलं (देशपांडे) यांना हा नमुना त्यांच्या हयातीत भेटला असता तर त्यांनी ‘तुज आहे तुजपाशी’ पेक्षा कितीतरी सरस मराठी नाटक लिहिले असते आणि पुलं नक्कीच नोबेल पारितोषिकाचे मानकरी झाले असते.

==========XXXXX==========


   

No comments:

Post a Comment

Indian Stand: Champions Trophy

                                                                                    Mohan Kothekar It has been decided by the ...